Monday, May 10, 2010

शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी



शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी
(10-05-2010 : 1:22:04)

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठ्यांच्या खराखुरा इतिहास समोर आणण्यासाठी राज्य शासनाने जागतिक दर्जाच्या मराठा इतिहास संशोधन अकादमीची स्थापना करावी असा ठराव पहिल्या मराठा इतिहास परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला.पहिल्या मराठा इतिहास परिषदेच्या समारोप प्रसंगी ११ ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष विकास पासलकर, नगरसेवक चेतन तुपे, वैजयंतीमाला पासलकर, संयोजक राहुल पोकळे, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.समारोप कार्यक्रमामध्ये मुबंई येथील अरबी समुद्रातील जागतिक शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवावा, शिवछत्रपतींच्या सर्व किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, औरंगाबाद विमानतळास राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे, पुण्यामध्ये महत्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करावे, लहुजी वस्ताव साळवे यांच्या नावाने क्रिडा पुरस्कार देण्यात यावा असे ठराव मंजूर करण्यात आले. श्रीमंत कोकाटे यांनी ठरावांचे वाचन केले.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खेडेकर म्हणाले, '' समोरासमोरच्या लढाया लढणे अशक्य असल्याने लेखणीव्दारे इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. मराठी, इंग्रजी, हिन्दी या भाषांबरोबरच इतर परकीय भाषांचा अभ्यास करून त्या भाषांमध्ये लिहल्या गेलेल्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून खरा इतिहास समोर येण्यास मदत होईल.''फुले अकादमीचे कार्यालय उभारावेमहात्मा फुले यांना इतिहास संशोधक म्हणूनही मान्यता काही लोकांनी दिली नाही. त्या महात्मा फुले यांच्या नावाने फुले इतिहास अकादमीची सुरूवात केली जात आहे ही आनंदाची बाब आहे. इतिहास संशोधनामध्ये भरीव कामगिरी करण्याची जबाबदारी फुले इतिहास अकादमीस पार पाडायची आहे. त्याचे हायटेक कार्यालय पुण्यात उभारावे अशी सूचना खेडेकर यांनी केली. तसेच त्याकरीता १ लाख रूपयांचा निधी मराठा सेवा संघाच्या वतीने देत असल्याची घोषणा केली.


Sunday, May 9, 2010

Maratha Itihas Parishad, Pune




हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले

हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले
(09-05-2010 : 2:24:29)

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वत:च्या हितसंबंधाच्या कक्षेतून माणूस इतिहासाकडे वळतो, त्यातून त्या त्या काळाचा अजेंडा म्हणून इतिहासाची निर्मिती, पुनर्निर्मिती होत जाते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे लिखाणही अशाप्रकारेच झाल्याचे मत डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने आयोजित पहिल्या मराठा इतिहास परिषदेतील 'शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह' या परिसंवादामध्ये ते बोलत होते. डॉ. उमेश कदम, डॉ. अनिल शिगारे यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.शिवाजीमहाराजांच्या इतिहास लेखनाचे सध्या तीन प्रवाह दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ढमाले म्हणाले, ''ब्राम्हणेतर चळवळीतून पुढे आलेला प्रवाह, कॉ. शरद पाटील यांनी विकसित केलेला जातिव्यवस्था व स्त्री दास्यमुक्तीचा प्रवाह, डॉ. सदानंद मोरे यांचे वारकरी प्रारूप, अशा तीन प्रकारे शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लेखन केले जात आहे. ब्राह्यणेतर चळवळ पुढे नेणाऱ्या मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांची गोब्राह्यण प्रतिपालक ही ओळख पुसून कुळवाडी भूषण ही ओळख पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांनी जमिनी नसलेल्या जाती- जमातींना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना त्या जाती-जमातींमध्ये निर्माण झाल्याचे कॉ. शरद पाटील यांनी मत मांडले आहे. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांना अग्रभागी ठेवून इतिहासाची मांडणी केली आहे.''महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे रूपांतर पुढील काळामध्ये ब्राह्यमणेतर चळवळीमध्ये झाले. शिवाजीमहाराज व रामदास स्वामी यांची भेट १६७२ मध्ये झाली तोपर्यंत स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणता येणार नाही. शिवकालीन इतिहासाचा वापर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये केला गेला. या चळवळीचे शिवाजी महाराज प्रतीक बनले होते, असे ढमाले यांनी सांगितले.
इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका
(09-05-2010 : 2:36:14)
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

दिवस पहिला :--

सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्‌घाटन :- फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते.

दुपारी बारा वाजता :- "शिवकाळचे इतिहास लेखन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "शिव इतिहास व विविध माध्यमे चित्रण, चिकित्सा'

रात्री ७वजत :- "अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास'

रात्री नऊ वाजता :- कोल्हापूरच्या कागल येथील शिवराज्य मंचतर्फे "छत्रपती शिवाजी महाराज' हे नाटक सादर केले जाणार आहे.

दिवस दुसरा

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता :- "शिवकर्तृत्वाचे विविध पैलू' आणि "शिवकाळाचे इतिहास लेखन'

दुपारी एक वाजता :-- "शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा-दिग्दर्शन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन विस्थापितांचा दुर्लक्षित इतिहास'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "इतिहास लेखकांकडून अपेक्षा'