Sunday, May 9, 2010

हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले

हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले
(09-05-2010 : 2:24:29)

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वत:च्या हितसंबंधाच्या कक्षेतून माणूस इतिहासाकडे वळतो, त्यातून त्या त्या काळाचा अजेंडा म्हणून इतिहासाची निर्मिती, पुनर्निर्मिती होत जाते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे लिखाणही अशाप्रकारेच झाल्याचे मत डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने आयोजित पहिल्या मराठा इतिहास परिषदेतील 'शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह' या परिसंवादामध्ये ते बोलत होते. डॉ. उमेश कदम, डॉ. अनिल शिगारे यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.शिवाजीमहाराजांच्या इतिहास लेखनाचे सध्या तीन प्रवाह दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ढमाले म्हणाले, ''ब्राम्हणेतर चळवळीतून पुढे आलेला प्रवाह, कॉ. शरद पाटील यांनी विकसित केलेला जातिव्यवस्था व स्त्री दास्यमुक्तीचा प्रवाह, डॉ. सदानंद मोरे यांचे वारकरी प्रारूप, अशा तीन प्रकारे शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लेखन केले जात आहे. ब्राह्यणेतर चळवळ पुढे नेणाऱ्या मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांची गोब्राह्यण प्रतिपालक ही ओळख पुसून कुळवाडी भूषण ही ओळख पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांनी जमिनी नसलेल्या जाती- जमातींना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना त्या जाती-जमातींमध्ये निर्माण झाल्याचे कॉ. शरद पाटील यांनी मत मांडले आहे. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांना अग्रभागी ठेवून इतिहासाची मांडणी केली आहे.''महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे रूपांतर पुढील काळामध्ये ब्राह्यमणेतर चळवळीमध्ये झाले. शिवाजीमहाराज व रामदास स्वामी यांची भेट १६७२ मध्ये झाली तोपर्यंत स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणता येणार नाही. शिवकालीन इतिहासाचा वापर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये केला गेला. या चळवळीचे शिवाजी महाराज प्रतीक बनले होते, असे ढमाले यांनी सांगितले.

No comments: